Tuesday, August 28, 2007

ओवाळणी सांग काय घालु तुला..

सोनियाचा दिवस हा . निर्मळ नात्याचा सोहळा
शब्दातून काय वर्णावे , सुंदर क्षण हा आगळा

रेशमी नाजूक बंधन , निस्वार्थ मायेची ही गुंफ़ण
बंधनातही आनंद या, धाग्याचा या रंगच वेगळा
शब्दातून...

वर्षभर भांडण जरी, दडलंय मनी प्रेम तरी
अबोल स्नेहाला बोलका, करतो सण हा खुळा
शब्दातून...

एक मैत्रिण ती, कधी तर छोटीशी आई पण असते
न्यारंच हे नातं , खरंच ,अनमोल असे ते सकळा
शब्दातून...

आजन्म पाठिशी राहीन, गरज नव्हे बोलण्याची
जन्मच तोकडा जिथे, ओवाळणी सांग काय घालु तुला
शब्दातून...

Sunday, August 26, 2007

पहिलं प्रेम....

धुंद पाऊस पाहायला खिडकीत आलो
अन् मनातल्या मनात चिंब भिजलो

न जाणे कुठून एक सुगंधी आठवण स्मरली
मुग्ध कविता होऊन ती समोर अवतरली

कांती तिची तेजस, वाणी ती मधाळ
बोलके ते नयन ,हसने ते लडिवाळ

आनंद गगनाला तोकडं ठरवू लागला
क्षणोक्षणी मनाला माझ्या फसवू लागला

त्या अनोख्या नात्याची आता उब कळली
वाटलं आज खऱ्या प्रेमाची जादू कळली

हळूहळू आप्तजनांशी पहिली भेट घडवली
सगळ्यांच्या मनात ती हळूच दडली

पण नशीब मोठं मजेशीर असतं
आणि सुखाशी त्याचं वैर असतं
ताटातुट झाली दोन भावनांची
एक झालेल्या दोन निष्पाप जिवांची

आता मात्रा तुम्ही कंटाळला आहात
नेहमीचा विषय पाहून झोपाळला आहात
पण ती काल परत भेटली हो.......
अकस्मात ड्रॉवरमधनं अवतरली
पहिली काव्यक्षरं पाहून मन कोण आनंदले
खरंच पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले..

Wednesday, August 22, 2007

आपले (अति)गतिमान आयुष्य...

खरं तर आयुष्य म्हणजे एक भोवरा आहे
गतिमान रहा, नाहीतर काळाचा पहारा आहे

गती घेता घेता तर उडालो आम्ही हवेतच
अहंकारी पंखाना फ़क्त क्षितीजाचा किनारा आहे

कट,कपट, कसेही करून आहे जिंकायचे
निर्मळ,प्रेमळ, साधा माणूस इथे बावरा आहे

सगळ्याच गोष्टींना आहेत इथे किंमती
सर्वस्व कवडीमोल विकायला माणूस हावरा आहे

कलीने विणले आहे काय सुंदर जाळे
या अमावस्येत मोजकाच रंग पांढरा आहे

रंग बदलून बदलून ओळखच विसरलॊ स्वतःची
शेवटी स्वतःशी इमानदार तोच माणुस खरा आहे

Friday, August 10, 2007

तो फ़क्त एक क्षण (sad version)

नमस्कार मित्रानो.... काही दिवसांपुर्वी मी 'तो फ़क्त एक क्षण ' ही एक कविता लिहिली होती... त्याला एक गुलाबी रंग होता.. आनंदाचा आविष्कार होता... काल मी एक कथा वाचली , त्यातून हे त्या कवितेचं वेगळं रुप चितारावसं वाटलं...

तो फ़क्त एक क्षण , ह्रुदय भेदून गेला
जन्मोजन्मीची गाठ, क्षणात तोडून गेला

ती शांत निजली होती चितेवरी
अन तो गार वारा,मज विझवून गेला

सगळ्या आठवणी धोधो कोसळताहेत
आसवांचे मेघ तो पूर्ण आटवून गेला

वाटलं आत्ता मागनं येउन बिलगशील
ऎवजी भेटला काळ,मजवर तो हसून गेला

नियतीशी त्याचं संधान होतं बहुधा
या विज्ञानयुगातही, मज हतबल करून गेला

रे अभिजित, तू शुन्य आहेस रे काळासमोर
म्हणून अश्रू आवर, तो मज समजावून गेला....

Friday, August 3, 2007

तु गेलिस निघून....

तू आयुष्यात आलीस, स्वप्नांचं दार उघडलं
तु गेलिस निघून, मन मात्र स्वप्नातंच अडकलं

तुझ्यासाठी सगळ्या प्रार्थना केल्या
आता वाटतं, मी नास्तिकच बरा नव्हतो का

तू आलिसच का एका झऱ्यासारखी
मी वाळवंटात अतृप्तच बरा नव्हतो का

फ़क्त हसुन तू फ़ुलं उधळायचीस
त्या काट्यांपेक्षा मी निष्पर्ण बरा नव्हतो का

तुझी चूक नाही अन माझीही नाही
आपल्याला भेटवणाऱ्या नशिबाचीही नाही
पण वाटतं, मी एकटाच सुखी नव्हतो का..

जाताना तू जगणं घेउन गेलीस
हं .. मी मेलेलाच बरा नव्हतो का..

मुन्नाभाई...

नमस्कार मित्रानो... संजू बाबाला झालेल्या शिक्षेवरुन ही कविता मला सुचली ...मला जे वाटते ते मी लिहिलं , चू-भू माफ़ असावी.. ..

मुन्नाभाईंचे दिवस फ़िरले
झाले सगळे राज्य खालसा
खरी गांधिगिरी शिकायला
तुरुंगात निघाला जलसा

जनता खूप हळहळली
त्यांची निर्मळ इच्छा तुटली
त्यांची तरी काय चूक हो
चित्रपटातली भुमिका पटली

शस्रं देणाऱ्याला जन्मठेप
अन घेणाऱ्याला काहीच नाही
तेव्हा जो माणुसकी विसरला
माफ़ी मागताना त्याला लाजच नाही

त्याने दीड वर्ष भोगले
निष्पाप पूर्ण जन्म भोगत आहेत
रडेल मुन्ना आणि चार दिवस
ते कधीचे अश्रूच बघत आहेत

म्हणून मुन्नाने ही अग्निपरिक्षा द्यावी
निर्मळ सोने होण्यासाठी शिक्षा घ्यावी
सुप्रीम कोर्ट वाचवेलही सुद्धा
पण त्याने न्यायाचीच दिक्षा घ्यावी
मग नंतरचा मुन्ना खरा निरागस असेल
स्वतःच्या नजरेत निर्दोष असेल...