Friday, June 22, 2007

आयुष्य तेच आहे..

संगीता जोशी यांच्या 'आयुष्य तेच आहे' या गझलेवरुन सनिल पांगे यांनी 'मराठी कविता' कम्युनिटी वर चारोळी श्रुंखला सुरु केली आहे... त्यातील माझा अल्पसा सहभाग आपल्यासाठी सादर करतो आहे॥

आयुष्य तेच आहे
कर्तव्याचा मुक्तछंद आहे
उमटले चार निस्वार्थ शब्द
तर ग्रंथ हा मोलाचा आहे

आयुष्य तेच आहे
साश्रु निरोप आहेत
निष्पाप त्या मनाचे
नशिबावर आरोप आहेत

आयुष्य तेच आहे पण
मला त्यानी बदलवलंय
सोपं आहे रुप बदलणं
आरशालाही मी फ़सवलंय..

आयुष्य तेच आहे
डोळ्यात लपलेली स्वप्नं आहेत
हसलो मी चारचौघात जरी
एकांतात हसणारे फ़क्त अश्रु आहेत

आयुष्य तेच आहे
सुखाचे चटके आहेत
दुःखाचे मलम आहे
आपलेच शब्द अन आपलेच अर्थ आहेत

आयुष्य तेच आहे
स्वप्नांचे क्रिकेट आहे
जिंकलो तर ऑस्ट्रेलिया
हरलो तर भारत आहे

आपली शेवटची भेट
शेवटची ती गोड आठवण
आयुष्याच्या या ग्रिष्मातला
तो शेवटचा मुग्ध श्रावण

तू अलगद हात धरलास
मन अलगद आकाशी उडालं
तुझ्या अस्मानी डॊळ्यांमधे
माझं आयुष्य सामावलं

तू अलगद हात धरलास
जणु परिसस्पर्श झाला
संथ, निश्चल जीवनात
चैतन्याचा झरा आला..

तू अलगद हात धरलास
अलगद बाहुत शिरलीस
तुझ्या आरस्पानी मनात
मला दडवून गेलीस...

आयुष्य तेच आहे
उधार श्वास आहेत
तु गेलिस निघून तरी
तुझेच भास आहेत

आयुष्य तेच आहे
स्वप्नांची आरास आहे
रोज नवीन सजावट
हीच मजा खास आहे

आयुष्य तेच आहे
सगळ्यांना हसवतो आहे
डोळ्यात ढग साकळलेत तरी
मुखवट्याला हसणेच आहे

आयुष्य तेच आहे
माळलेले गुलाब आहेत
उमललेले हास्य आहेत
दडलेले काटेही आहेत.

आयुष्य तेच आहे
एक जादुचा खेळ आहे
वेदनेला अलगद विसरण्यासाठी
स्वप्नांचे संमोहन आहे

आयुष्य तेच आहे
नवीन नाती जोडणे आहे
जुनी द्रुढ करणे आहे
यातच स्वतःलाही जपणे आहे

आयुष्य तेच आहे
स्वप्नांमागे धावायचे आहे
ती भासतात मात्र दुर
पण त्यातच तर खरी मजा आहे

Sunday, June 17, 2007

परत रात आली..

परत रात आली, सुगंधी स्वप्नं घेऊन
तिला भेटायचं एकांती, सर्व बंधनं तोडुन

चांदण्याही उतरल्य़ा होत्या मग धरणीवर
कसं राहवेल त्याना,चंद्राला मजसवे सोडुन

खरं तर पावसालाही सांगुन ठेवलंय
बरसू नकोस, ती येण्याची वेळ सोडून

दुसरी स्वप्नंही रागावली,त्याना जागाच नाही
काय करु, आता राहवेना तिला सोडुन

अखंड लयलूट झाली मग प्रेमभावनांची
ओथंबली पहाट, गेली नेत्री दव सोडून

मनाला आहे परिसस्पर्श हा पुरेसा
नाही कुणात जादू ही, एक तिला सोडून

नाही म्हणता म्हणता,
परत रात सरली, गेली जीव अडकवून
परत रात सरली, मला एकटं सोडून

Friday, June 1, 2007

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला

पावसाचं काय, तो नेहमीच येतो
प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला

चांदण्यातही आता मला तीच दिसते
जणू तो चंद्र मला फ़सवून गेला

देवळातही दुसरं काही मागवेना
नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला

मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो
अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला

शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..

Sunday, May 20, 2007

हैदराबाद बॉम्बहल्ला .. एक विचार..

दिनांक १८ मे २००७, स्थळ हैदराबाद ,दुपारी २ च्या सुमारास मशिदीत जमलेल्या भाविकांवर भ्याड बॉम्बहल्ला झाला..
अतिरेक्यांच्या अंध, तत्वहीन हेतुंच्या पाठपुराव्यासाठी आणिक काही निरपराध सोंगट्यांसारखे उडवले गेले... खरंच माणसाला माणसाची किंमत उरलेली नाही... स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी या सुंदर जगाचा ध्वंस करण्याचा हक्क कुणी दिला यांना.. अशाच एका खेळणं बनलेल्या मनुष्याचा आत्मा हे भेसुर द्रुश्य बघुन सगळ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय...

लख्ख, सुंदर दिवस होता
अचानक रात्र झाली
प्रार्थना तर केली देवाची
सैतानाची हाक आली

मी कधी केले
कुणाचे टीचभर नुकसान
माझ्याच का नशिबी
विनाशाची वाट आली

स्वप्नांचे काय होणार
घराचे हाल कोण सोसणार
एका क्षणात भविष्य चिरडत
ती भेसुर घडी आली

धर्माचे गुणगान फ़क्त
अंध अतिरेकीच ते भक्त
मनुष्यधर्माची जाण कधी
कुणा का न आली

राजकारणाचे युद्ध सारे
कुणी तरी हारणारच
पण न खेळणाऱ्यांच्या माथी
कशी काय शिक्षा आली

पेटवा माणुसकीची होळी
पडू द्यात आहुत्या
स्वतःवर वेळ आल्याशिवाय
तुम्हास माणसाची किंमत न आली

काय मिळवाल तुम्ही
शाप सोडुन काही मिळणार नाही
काय जिंकाल तुम्ही
पायाखाली प्रजाही उरणार नाही
विनाशाचा मार्ग आहे हा
स्वतःहुन तो पत्करु नका
निरपराधावर लादु नका
अतिरेकी धुंदीत कळणार नाही
मृत्युची पावलं कधी धावत आली...

Wednesday, May 16, 2007

वावटळ- गझल (एक प्रयत्न)

उकरलेलं मन तो सारवत होता
निश्चल स्वप्नांना परत चालवत होता

कुणी ध्वस्त केलं सुंदर ते जग
विखुरलेल्या आठवणी तो आवरत होता

चेहऱ्यावरचं हसु पळवलं कुणीतरी
नेमकं उलट्या दिशेने तो धावत होता

आकाशालाही वाटला का त्याचा हेवा
मनाचं गळकं छप्पर तो बुजवत होता

झगमगाटात दिपले होते त्याचे डॊळे
शेवटचा दिवा तो आता मालवत होता

मंद वावटळीत भरकटले होते शब्द
जुनी ओळख म्हणुन त्याना बोलवत होता